राजगुरूनगर – प्रतिनिधी
खेड तालुक्यातील चांडोली येथे एका कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (१२ जून) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घडली. अजित शिवाजी टाकळकर (वय २८, रा. टाकळकरवाडी, ता. खेड) असे या कामगाराचे नाव आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चांडोली गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या एका रोहित्रावर तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी अजित टाकळकर हे विद्युत खांबावर चढले होते. काम सुरू असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की ते थेट खांबावरून खाली पडले आणि जवळच असलेल्या भिमा नदी पात्रालगतच्या गाळात जाऊन कोसळले.
सहकाऱ्यांनी तात्काळ ही घटना लक्षात घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर अजित यांना मृत घोषित केले. खेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
अजित टाकळकर हे गेली पाच वर्षांपासून राजगुरूनगर उपविभागात कंत्राटी तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना, त्यांनी वीज वितरण कंपनीच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच जोखीम पत्करून काम केले. मात्र, अशा प्रकारच्या धोकादायक कामात आवश्यक सुरक्षा साधनांची आणि उपकरणांची उपलब्धता त्यांच्या सेवेत होती का? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
अजित हे कुटुंबातील तरुण व कर्तबगार सदस्य होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 Comments