पुरंदर रिपोर्टर Live
पिंपरी-चिंचवड :प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, “संधीसाधू लोकांना आमच्या सोबत घेणार नाही. जे भाजपसोबत गेले त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही. संधीसाधूपणाचं राजकारण आमच्या पक्षाला करायचं नाही.”
राज्यभरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. पवार पुढे म्हणाले, “कोणी आमच्याकडे यायचं ठरवलं, तर त्याबाबत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील, मात्र पक्षाच्या धोरणाशी तडजोड केली जाणार नाही.”
या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भाजपविरोधी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडताना दिसत आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, उमेदवारी आणि आघाडी धोरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments